ईदला सारसबाग बंद ठेवून नागरी अधिकार नाकारला   

मुस्लीम सत्यशोधक मंडळाकडून पुणे पालिकेचा निषेध

पुणे : ईदला सारसबाग बंद ठेवून महापालिका प्रशासनाने एका विशिष्ट समुदायाचे नागरी अधिकार नाकारले आहेत. हा निर्णय संतापजनक व निषेधार्ह आहे. मुस्लीम समाजाला वेठीस धरून त्यांची गळचेपी करणारे वक्तव्य आणि वर्तन केवळ अपमानास्पद नसून मुस्लीम समाजाचे भारतीयत्व नाकारणारे आहे. अशा शब्दांत मुस्लीम सत्यशोधक मंडळाकडून महापालिका प्रशासन व तसे पत्र देणार्‍या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या पत्राचा निषेध करण्यात आला आहे. 
 
ईदच्या दिवशी इतरांसाठी सारसबाग बंद ठेवून फक्त हिंदू भाविकांसाठी मंदिर खुले ठेवावे असे पत्र मेधा कुलकर्णी यांनी महापालिकेला दिले होते. महापालिका अधिकार्‍यांनी परिस्थितीची कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता ईदला सारसबाग बंद ठेवली. या कृतीतून महापालिका प्रशासनाने मुस्लीम समाजाचा अवमान करून त्यांचे नागरी अधिकार नाकारले आहे. असे मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. समसुद्दीन तांबोळी यांनी पत्रात नमूद केले आहे. 
 
मुस्लीम समाजाचे रमजाण ईद आणि बकरी ईद हे दोन महत्त्वाचे सण असतात. या काळात महिलांना स्वच्छता, स्वयंपाक करताना खूप परिश्रम पडतात. या कामापासून त्यांना विश्रांती मिळावी म्हणून ईदच्या दुसर्‍या दिवशी घराबाहेर पडून आनंद शोधत असतात. मात्र मेधा कुलकर्णी यांच्या पत्रामुळे सारसबाग बंद ठेवण्यात आली. या कृतीमुळे कुलकर्णी या आक्रमक दिुत्ववादी भूमिका घेऊन धार्मिक तणावास पोषक वातावरण तयार करीत असल्याची भावना समाजात निर्माण झाली असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. सर्वसामान्य मुस्लीम समाजाविरोधात संशय, द्वेष, शत्रूभाव निर्माण करणारे असे पत्रक काढणे हे या समाजाचे संविधानिक मूलभूत अधिकार नाकारणारे आहे. मुस्लीम समाजाला वेठीस धरून त्यांची गळचेपी करणारे वक्तव्य आणि वर्तन केवळ अपमानास्पद नसून मुस्लीम समाजाचे भारतीयत्व नाकारणारे असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.  

अस्पृश्यतेसाख्या प्रथेला खतपाणी 

 
एखाद्या विशिष्ट समुदायाला लक्ष करणे, त्यांच्याविषयी समाजात द्वेष पसरविणे, त्यांना बागेत प्रवेश नाकारून ही कृती म्हणजे अस्पृश्यतेसारख्या अमानुष प्रथेला पुन्हा जन्माला घालतोय हे ध्यानीमनी येत नाही यांचे आश्चर्य वाटते. वास्तविक शिस्त मोडणार्‍यांविरोधात कायदे अस्तित्वात आहेत. त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होण्यासाठी यंत्रणा व व्यवस्था निर्माण करता येणे शक्य आहे. मांसाहारामुळे मंदिराचे पावित्र्य भंग होत असेल, तर तिथे मांसहराला बंदी घालावी, कोणत्याही समुदायाच्या माणसांना नाही. 

- डॉ. समसुद्दीन तांबोळी, अध्यक्ष, मुस्लीम सत्यशोधक मंडळ.

बाग बंद ठेवणे ही कोणती नैतिकता?

? ईदच्या दुसर्‍या दिवशी पारणे असते. त्यामुळे या दिवशी बहुतांश मुस्लीम मांसाहार करत नाहीत. गोडधोड पदार्थांचे सेवण केले जाते. रोजच्या व्यापातून वेळ काढून घराबाहेर पडणे, आनंद घेणे, मुलांचे मनोरंजन करणे आदी गोष्टी मुस्लीम धर्मिय दुसर्‍या दिवशी करतात. त्यामुळे त्यांना बागेत प्रवेश न देणे किंवा बाग बंद ठेवणे ही नैतिकता आहे का? प्रवेश नाकारणे हे कोणत्याच नियमांत आणि कायद्यात बसत नाही. संविधानाने या देशातल्या प्रत्येकाला अधिकार दिले आहेत. ते अधिकार नाकारणे हे बरोबर नाही. 

- डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ कामगार नेते. 

 

Related Articles